सोलापूर : वृक्षारोपणाच्या चळवळीतील कार्यकर्ते काशिनाथ भतगुणकी यांना नुकताच वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपट दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
किर्लोस्कर समूहातर्फे सोलापुरात नुकताच वसुंधरा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या महोत्सवात दुसऱ्या दिवशी भतगुणकी यांचा गौरव करण्यात आला. या वेळी उपवनसंरक्षक एस. एन. माळी, पर्यावरणप्रेमी बाबूराव पेढकर, वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते.
काशिनाथ भतगुणकी हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपले गाव पूर्णतः प्लास्टिकमुक्त केले आहे. त्यासाठी त्यांनी ग्रीन आर्मीची स्थापना केली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना रोप, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी चित्राव यांनी संदीप सावंत आणि नीरजा पटवर्धन यांच्याशी संवाद साधला. तसेच माळी यांनी आपले विचार व्यक्त केले. या समारंभाला पर्यावरणप्रेमी नागरिकांनी गर्दी केली होती. हृषीकेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.